28/11/2024
बऱ्याच साठी पार केलेल्या लोकांना प्रश्न पडतो की आपण असतानाच आपल्या मुलांमध्ये एवढे मतभेद आहेत आपण गेल्यावर काय करतील? मालमत्ते वरून वाद तर होणार नाहीत ना...आणि आत्ताच जर मी ह्यांना मालमत्ता देऊन टाकली तर मला काही झाल्यावर हे मला सांभाळतील की नाही?अशी भीती वाटणं साहजिक आहे..आजकाल मालमत्ते साठी सख्खे भाऊ वैरी होतात..
मग ह्यावर उपाय काय?तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक मालमत्तेचे इच्छापत्र करू शकता. लोकं इच्छापत्र म्हणलं की घाबरतात.पण ती एक सोय असते जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मालमत्तेवरून तुमच्या वारसांमध्ये भांडण होणार नाहीत.
आता इच्छापत्र म्हणजे नक्की काय?ते कसं लिहायचं आणि त्यासाठी काय कागदपत्र लागतात?ते आपण बघुया..
•इच्छापत्र/मृत्युपत्र म्हणजे काय?
इच्छापत्र म्हणजे व्यक्तीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे त्याच्या मृत्यूनंतर व्यवस्थापन करणारा दस्तऐवज....इच्छापत्र म्हणजे अशी सोय जी व्यक्ती जिवंत असताना केल्यामुळे मृत्यूनंतर तिच्या वारसांमध्ये तिच्या property वरून भांडण होणे टाळते.
इच्छापत्र तुम्ही साध्या कागदावर पण करू शकता.इच्छापत्र कितीही वेळा बदलता येते.त्यातले सगळ्यात शेवटचे इच्छापत्र ग्राह्य धरले जाते.आता ह्यामध्ये देखील थोडा वाद आहे.एकाधिक मालमत्तांकरिता वेगळे इच्छापत्र करता येते .पण मग त्यातील आधी केलेले इच्छापत्र वेगळ्या मलमत्तांसाठी असेल तर ते रद्द होत नाही.जरी शेवटचे इच्छापत्र ग्राह्य धरले जात असले तरी आधीचे इच्छापत्रातील मालमत्ता वेगळी असेल तर ते देखील ग्राह्य धरले जाते.
ह्यामध्ये मूळ इच्छापत्रात बदल करणारा मसुदा तयार केला तर त्याला ' इच्छापत्राची पुरवणी ' म्हणतात.
•इच्छापत्र कोण बनवू शकते?
कायदेशीरदृष्ट्या सज्ञान (वयाची 18 वर्ष पूर्ण असलेली) असलेली व्यक्ती व मानसिक दृष्ट्या स्थिर असलेली कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र बनवू शकते.
अशी व्यक्ती फक्त स्वतःच्या इच्छेने इच्छापत्र बनवू शकते.कोणाच्या दबावाने किंवा प्रभावाखाली येऊन केलेले इच्छापत्र वैध मानले जात नाही(अर्थात मृत्यूनंतर ते सिद्ध करणे फारच अवघड असते).
मूक,अंध किंवा बहिर्या व्यक्ती सुद्धा इच्छापत्र बनवू शकतात परंतु अशा परिस्थितीत त्यांच्याजवळ त्यांच्या कार्याचे कायदेशीर परिणाम समजून घेण्यासाठी लागणारी सक्षमता असणे आवश्यक आहे.
इच्छापत्र कसे करावे?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.. इच्छापत्राचे कोणतेही ठराविक स्वरूप (format) नसते.तुम्ही साध्या कागदावर साध्या शब्दात सुद्धा इच्छापत्र लिहू शकता.त्यामुळे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वकिलाची मदत घेतलीच पाहिजे असं काही नाही.पण पुढे जाऊन काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी तुम्ही वकिलाची मदत घेऊ शकता.
इच्छापत्र तयार करताना सगळ्यात आधी तुमच्याकडे असेलल्या सर्व मालमत्तेची कागदपत्रे गोळा करा.प्रत्यक्ष इच्छापत्रात ह्या कागदपत्रांची काही आवश्यकता नसली तरी लिहिताना वर्णन अचूक यावे यासाठी तुमच्याजवळ सगळी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
इच्छापत्र लिहताना त्यात तुमच्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील नीटपणे लिहीलेला हवा.इच्छापत्र लिहिताना जरी कोणत्याही format ची गरज नसली तरी त्यात वापरलेली भाषा ही समोरच्याला समजेल अशी सहज, सोपी आणि नेटकी असावी.
आपल्या मालमत्तेचे वर्णन नीटपणे केलेले असावे जेणेकरून नंतर नक्की कोणत्या मालमत्तेचे वर्णन आहे असा प्रश्न संभवणार नाही. समजा , चांदी सोन्याचे दागिने असतील तर त्याचा देखील तपशील म्हणजे त्याचं वजन आणि डिझाईन कशी आहे त्यातला कोणता दागिना कोणत्या व्यक्तीला दिला आहे ह्याचे वर्णन नीटपणे करणे आवश्यक आहे.
इच्छापत्रात मृत्यूनंतर जर तुम्हाला व्यवस्थापक (executor) नेमायचा असेल तर तुमच्या इच्छापत्राची व्यवस्था लावणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच व्यवस्थापकाचे नाव,वय,पत्ता आणि तुमच्याशी असलेलं नातं लिहणे आवश्यक असते .
•इच्छापत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
इच्छापत्र तयार करताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र जोडण्याची गरज नसते .फक्त इच्छापत्र लिहणारी व्यक्ती मानसिक दृष्ट्या स्थिर आहे हे दर्शविणारे डॉक्टर चे प्रमाणपत्र लागते.
इच्छापत्र तयार झाल्यानंतर त्यावर इच्छापत्र करणाऱ्याची सही किंवा शिक्का आणि दोन साक्षीदारांची सही ...बस......
इच्छापत्र कायदेशीर ठरण्यासाठी त्यावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने आवश्यकआहे. इच्छापत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर इच्छापत्रावर सही करणे गरजेचे आहे.
टीप: इच्छापत्रातील लाभार्थींना साक्षीदार म्हणून सही करता येत नाही आणि साक्षीदारांना इच्छापत्रातील तपशील माहीत असणे गरजेचे नाही.
•वडिलोपार्जित संपत्तीचे इच्छापत्र करता येते का?
स्पष्ट नाही.......
तुम्ही फक्त तुमच्या वय्यक्तिक मालमत्तेचे व्यवस्थापन इच्छपत्राद्वारे करू शकता.
जर तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन झाले असेल तर त्यातली विभाजन होऊन तुमच्या हिश्श्याला आलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित म्हणून ओळखली जाते.त्यामुळे त्या मालमत्तेचे व्यवस्थापन तुम्ही इच्छापत्राने करू शकता.
•इच्छापत्राची नोंदणी आवश्यक आहे का?
इच्छपत्राची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही .तुम्ही साध्या कागदावर लिहलेले मृत्युपत्र देखील ग्राह्य धरले जाते.ते केल्यानंतर त्याची नोंदणी केलीच पाहिजे असे बंधन नाही.नोंदणी न केलेले इच्छापत्र कायदेशीर मानले जाते.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असे मानले आहे की नोंदणीकृत नसलेली इच्छापत्र वैध आणि कायद्याने लागू करण्यायोग्य आहेत . परंतु, नोंदणी न केलेल्या इच्छपत्राना न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे निबंधक कार्यालयात तुमचे इच्छापत्र नोंदणीकृत करून घेणे केव्हाही चांगले.
इच्छा पत्राची नोंदणी करण्यासाठी कोणतीही मुदत नसते.तयार केल्यानंतर लगेचच नोंद केली पाहिजे असे आवश्यक नाही.तुम्ही इच्छापत्र तयार केल्यानंतर कितीही दिवसांनी त्याची नोंदणी करू शकता.
इच्छापत्रासाठी कोणतीही स्टॅम्प ड्युटी लागत नाही .त्यामुळे खरेदीखत किंवा बक्षीस पत्राच्या तुलनेत इच्छा पत्राने केलेल्या हस्तांतरणाला खर्च कमी येतो. इच्चापत्राची नोंद करताना फक्त नोंदणीचा खर्च लागतो.
•इच्छापत्र कधी करावे?
आपल्याकडची लोकं असं म्हणतात की धडधाकट माणसं कुठे मृत्युपत्र करतात का....आपलं वय झाल्यानंतर मृत्युपत्र केलं पाहिजे ..जेव्हा मृत्यू जवळ आला असं वाटतं तेव्हा मृत्युपत्र केलं पाहिजे ....लवकर केलं तर लवकर मृत्यू येतो वगैरे...
पण मृत्यू कधी सांगून येत नाही.वय झाल्यावरच मृत्यू होईल असं सांगता येत नाही.त्यामुळे मन स्थिर असताना आणि आरोग्य उत्तम असताना मृत्युपत्र करणे योग्य.
•इच्छापत्राची अंमलबजावणी कधी करता येते?
अर्थातच इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर..इच्छापत्र हे करणाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारे दस्तऐवज आहे त्यामुळे त्याची अंमबजावणी ही करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच करता येते.
हस्तंतरणाचे इतर देखील पर्याय आहेत.जसे की खरेदीखत , बक्षीसपत्र ..परंतु एकदा केलेले बक्षिसपत्र किंवा खरेदीखत तुम्हाला रद्द करता येत नाही.आणि इच्छपत्राचा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमच्या मालमत्तेचा तुम्ही तुमच्या मृत्यूपर्यंत उपभोग घेऊ शकता.तुमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर तुम्ही जिवंत असेपर्यंत कोणीही हक्क सांगू शकत नाही.शेवटी निर्णय तुमचाच......